आजोबागड किल्ला

बालाघाटाच्या रांगेत रतनगड आणि हरिश्चंद्रगड यांच्या मधोमध अगदी कडेला असलेला ‘अजापर्वत’ उर्फ ‘आजोबाचा डोंगर’ एखाद्या पुराण पुरुषाप्रमाणे भासतो. घनदाट झाडाझुडुपांनी नटलेला हा आजोबाचा गड गिर्यारोहकांसाठी एक आगळे वेगळे लक्ष्यच ठरला आहे. या गडाची ३००० फूट उभी भिंत ही प्रस्तरोहकांसाठी एक मोठे आव्हानच आहे.
इतिहास :
गडाचे नाव आजोबा कसे पडले यावर एक पुराणकथा प्रसिद्ध आहे. याच गडावर बसून वाल्मिकी ऋषींनी ‘रामायण’ हा धर्मग्रंथ लिहिला. याच गडावर सीतामाईने लव आणि कुश यांना जन्म दिला. लव आणि कुश वाल्मिकी ऋषींना ‘आजोबा’ म्हणत असत. म्हणूनच या गडाचे नाव आजोबाचा गड असे पडले अशी कथा सांगितली जाते. येथे गडावर वाल्मिकि ऋषीचा आश्रम व त्यांची समाधीसुद्धा आहे.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :
पहिली वाट पकडून वाल्मिकी ऋषींच्या आश्रमापाशी साधारणतः अर्ध्या तासात पोहचावे. वाल्मिकी ऋषींच्या आश्रमाजवळून गडाच्या माथ्यावर जाण्यासाठी वाट नसल्याने आपल्याला मुक्काम आश्रमातच करावा लागतो. येथे गडावर रहाण्यासाठी एक कुटी आहे. जवळच झरा आहे. जर मुक्कामाचा कार्यक्रम असेल तर जेवणाची सोय आपल्याला घरूनच करून आणावी लागते. आश्रमाजवळून पुढे धबधब्याच्या वाटेने चढत गेल्यास सुमारे एक ते दीड तासानंतर वर एक गुहा लागते. येथे लवकुशाच्या पादुका खडकात कोरलेल्या आहेत. येथे डावीकडे एक पाण्याचे टाके सुद्धा आहे. या गुहेपर्यंत जाण्यासाठी शिड्या देखील लावल्या आहेत. याच मार्गाने आश्रमात परतावे. अशा प्रकारे मुंबईहून येणार्‍यांसाठी आजोबाचा गड एक निसर्गरम्य अशी दुर्गयात्राच ठरते. गडाच्या माथ्यावर दोन ते तीन पाण्याची टाकी सोडल्यास पहाण्याजोगे विशेष असे काहीच नाही. अनेक दुर्गवीर रतनगड-आजोबागड-हरिश्चंद्रगड असा ४ ते ५ दिवसांचा ट्रेक करतात.
गडावर जाण्याच्या वाटा :
  • मुंबईहून आसनगाव रेल्वे स्थानकावरून : गडावर जाण्याचा सरळ आणि सोपा मार्ग म्हणजे मुंबईहून आसनगाव रेल्वे स्थानकावर यावे. येथून शहापूर या गावी रिक्षेने अथवा एस. टी.ने यावे येथून पहाटेच एस.टीने अथवा जीपने डोळखांब-साकुर्ली मार्गे ‘डेणे’ या गावी यावे. ‘डेणे’ गावातून जाताना मध्ये एक पठार लागते. पठारावर तीन वाटा एकत्र येतात. यातील एक बैलगाडीची वाट सरळ वाल्मिकी ऋषींच्या आश्रमापाशी घेऊन जाते. दुसरी वाट कात्राबाईच्या डोंगरात जाते आणि पुढे ‘कुमशेत’ या गावास जाऊन मिळते. तिसरी वाट मात्र जंगलात जाते. या वाटेने न जाणेच श्रेयस्कर.
  • कल्याण-मुरबाड-माळशेज-डोळखांब यामार्गाने : कल्याण-मुरबाड-माळशेज-डोळखांब यामार्गाने सुद्धा डेणे गावी पोहचता येते.
  • कसारा-घोटी-राजूर-कुमशेत मार्गे : गडवरचा माथा पहाण्यासाठी कसारा-घोटी- राजूर- कुमशेत मार्गे जाता येते.
गडावरती रहाण्यासाठी आश्रम आहे. यात २० जणांना रहाता येते. गडावर जेवणाची सोय नसल्याने जेवणाचे साहित्य आपण स्वतःच घेऊन यावे. बारामाही पाण्याचा झरा सतत वाहत असतो त्यामुळे येथे पाण्याची सोय मुबलक प्रमाणात आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी साधारणपणे १ तासाचा अवधी लागतो. गडावर सापांचे फार वास्तव्य असल्याने योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा